Wednesday, 10 August 2022

घाटकुळ:- एक प्राचीन काळातील वैभव


चंद्रपुर जिल्हयातील पोंभूर्णा तालुक्यातील वैनगंगा नदीकाठी वसलेले "घाटकुळ "हे गाव आणि तेथील दगडी अवशेषांच्या खुणा अजूनही प्राचीन वैभव्याची साक्ष देताना दिसून येते. वैनगंगा नदीच्या अगदी काठावर असलेल्या घाटकूळच्या जुन्या ठिकाणाचे,ओसाड पडलेल्या जुन्या वस्तीचे, रिठाचे, रानांचे,मातीचे निरीक्षण केले असता हे ठिकाणी विविध राज्यांच्या राजवटीत गजबजलेले गाव असावेता या अर्थाचे पुरावे अजूनही दिसून येतात.
    एकेकाळी घाटकूळ हे गावा परगण्याचे मोठे शहर असल्याचा उल्लेख अ.ज.राजुरकर या इतिहास अभ्यासकांनी चंद्रपूर जिल्ह्याचा प्राचीन इतिहास या पुस्तकात केलेला आहे. वैनगंगेच्या काठावरील परगण्याचे ठिकाण असलेल्या या स्थळांकडे इतिहासकारांचे लक्ष कदाचित गेले नसणार त्यामुळे घाटकुळ हे गाव आणि तेथील वैभव्य ऐतिहासिक स्थळांच्या यादीत आलेले नाहीत. 
     या स्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन निरीक्षण केले असता अजूनही सातवाहन,वाकाटकद काळातील बांधकामात वापरलेल्या पक्या मातीच्या विटा दिसून येतात.विविध कलाकुसरीच्या दगडी मुर्त्या,शिवलिंग,गणेश,नागशिल्प इतरत्र पडलेले दिसून येते.पुर्वी नदीला लागून एक बाल्लेकिल्ला असल्याचे येथील वयोवृध्द मंडळी सांगतात. पण आता त्याची अवशेष सुद्धा शिल्लक नाहीत. कारण नदिकाठावरून गाव उंचभागावर स्थलांतरीत झाला तेव्हा त्या बाल्लेकिल्याचे दगड घरकामात वापरल्याचे बोलले जाते. बाल्लेकिल्लाच्या परीसरांचे निरीक्षण करीत असतांना एका उंच ठिकाणी काही शिल्पे आढळून आलीत .या शिल्पाचे निरीक्षण केले असता ही सर्व स्री शिल्प होती. ही शिल्पे उभी असून अत्यंत सुंदर कलात्मक पध्दतीने शिल्प कलावंतांनी कोरलेली आहेत. स्री शिल्पाच्या कानात मोठी कर्णकुंडले आहेत .कर्णकुंडले आज स्रीया जशी सुवर्णाची कर्णकुंडले घालतात त्या डिझाईनची म्हणजे कानांच्या खालील पाळीतून कानाच्या वरच्या भागात सुवर्णाचे डिझाईन परीधान केलेले दिसून येते. दोन्ही हातात मोठमोठी बाजुबंध परीधान केलेली आहेत .
या शिल्पातील स्रीने आजच्या स्रियां जसा टाॅप परीधान करतात त्याप्रमाणे शरीरावर टाॅप परीधान केलेला आहे. टाॅपवरील पायांच्या वरील त्रिकोणी डिझाईन शिल्पात स्पष्ट दिसून येते. शिल्पाच्या डाव्या हाताच्या मनगटांवर एक लहान मुलगा उभा आहे. स्त्रीने दोन्ही हातांनी दीप धरलेला असून उजव्या हातांनी तो दीप विझू नये म्हणून दीपावर आडवा धरलेला आहे. स्री शिल्पाच्या डोक्यावर एका नागाचे छत्र धारण केलेले असून. नागाच्या शरीराचा भाग हा स्रिच्या पाठीवर आलेला आहे. हे स्री शिल्प हातात दीप घेऊन द्वीपपुजन करण्याकरीता जात आहे असे हया शिल्पावरुन दिसून येते.शिल्पाच्या नाग छत्रावरुन ह्या स्रियां नागवंशीय राजघराण्यातील होत्या हे सिध्द होते. कदाचित हे स्री शिल्प नागवंशीय नागराणीचे असावेत असा तर्क प्रत्यक्षदर्शी बघितलेल्या अभ्यासकांनी लावलेला आहे.
   या प्राचीन किल्ल्याच्या टेकडीत किती प्राचीन इतिहासाचा खजिना दडलेला आहे हे एक महाकोडे आहे.
    पुरातत्व विभागाला नम्र विनंती आहे की, त्यांनी दखल घेऊन या बाल्लेकिल्ला टेकडीचे उत्खनन करावे जेणेकरून या भागातील प्राचीन संस्कृतीची ओळख अभ्यासकांना होईल आणि भूगर्भात लपलेला इतिहास जगासमोर येईल.

अरूण झगडकर
( इतिहास अभ्यासक)
गोंडपिपरी जि.चंद्रपूर
9405266915

वैनगंगेच्या काठावरील.... झगडकर रीठ



वैनगंगा नदीच्या तीरावर डोंगराच्या पायथ्याशी अगदी झाडाझुडपामध्ये लपलेली लहान मोठी दहा-पंधरा घरांची वस्ती असलेले माझे गाव. निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यावा असे प्रसन्न वातावरण, शुद्ध हवा , चोहीकडे हिरवेगार शेते, पक्षांचा आणि जंगली प्राण्यांचा मुक्त वावर असलेले प्रसन्न वातावरण माझ्या गावात अजूनही अनुभवायला मिळते.
         इंग्रज कालीन दस्तऐवजमध्ये माझ्या गावाचे नाव चकठाना जरी असले तरी परंतु आजच्या घडीला माझ्या गावाला झगडकर रिठ याच नावाने ओळखले जाते. कित्येक वर्ष आम्ही या गावात चिखल मातीतून पायदल चालून शाळा शिकलो. गावाला जोडणारा एकही मुख्य रस्ता नाही त्यामुळे शेतातून सतत चालू चालून पायवाट तयार व्हायची. मला अजूनही त्या पायवाटा कायमचा स्मरणात आहेत. तेव्हा गावात वीज नव्हती. शाळा तर खूप दूरची गोष्ट आहे. कित्येक वर्षे विकासापासून कोसो दूर असलेल्या माझ्या गावात आता मागील दोन-चार वर्षापासून विज पुरवठा केला आहे. गावातील रस्ता मुख्य मार्गाला जोडला जात आहे.
       तसे बघितले तर माझे गाव खूप प्राचीन असल्याचे जाणवते. कारण गावांच्या आजूबाजूला असलेल्या भग्न मुर्त्या, जुनी काही अवशेष आजही आपल्याला प्राचीन कालखंडाची साक्ष देतात. गावालाच लागून असलेले मारीतीचे मंदीर परिसर पाहून ते खूपच जुने आहेत असे आमचे आजोबा सांगत होते.मंदिराच्या आजूबाजूला पडलेले प्राचीन शिल्प, विटा, दगड अजूनही प्राचीन काळातील अस्तित्वाचे पुरावे दाखवतात. नदी काठावर गाव असल्यामुळे यदाकदाचीत पूर्वीच्या काळात येणारे महापुरे, महामाऱ्या यामध्ये पूर्वीचे गाव नष्ट झाले असावे आणि नव्याने लोक वस्ती तयार होऊन नवीन वहिवाट सुरू झाली असावी असा जुन्या जाणकार लोकांचा अंदाज आहे.
      पूर्वीच्या काळातील शेती ही परंपरागत पद्धतीची शेती होती त्यामुळे उत्पादन क्षमता खूप कमी होती.परंतु बदलत्या काळानुसार आता या गावातील शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करायला लागला आहे. नवीन नवीन कृषी अवजारांचा वापर करून उत्पादन क्षमता वाढवित आहे. जरी शहराच्या झगमगटापासून कोसो दूर असले तरी निसर्ग सौंदर्याच्या मुक्त उधळणीत गावातील शेतकरी बांधव मोठ्या अभिमानाने "गड्या आपला गाव बरा" या अविर्भावात जीवन जगत आहेत. गाव जरी लहान असेल तरी त्याच गावाला तीर्थ समजून येतील गावकरी गुण्यागोविंदाने नांदत आहेत.

🖋️अरूण झगडकर
९४०५२६६९१५