Friday, 15 July 2022

कमलापुर :- चमत्काराचा नैसर्गिक वारसा



स्वर्गाची कल्पना केली तरी आपले मन अवकाशात जाऊन स्थिरावते. मेघविरहित स्वच्छ सुंदर निरभ्र आकाश नजरेसमोर येतो आणि कपोलकल्पित विश्वात आपले मन रममान होते.परंतु आपणास प्रत्यक्ष पृथ्वीवरच्या स्वर्ग बघायचा असेल तर ते गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूरच्या जंगलात प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो. निसर्गाच्या रंगछटांची उधळण केलेले हे स्थळ प्राचीन काळापासूनच सृष्टीचे वरदान ठरलेले आहे. प्राचीन काळापासून या भागावर राष्ट्रकुट, चालुक्य, देवगिरीचे यादव आणि त्यानंतर अहेरी येथील गोंड राजघराण्यानी राज्य केलेले आहेत. कमलापूर हे गाव सिरोंच्या वनक्षेत्रात येत असून ते अहेरी तालुक्यात आहेत. निसर्गरम्य सौंदर्याने नटलेल्या परिसरात हे गाव वसलेले आहे.वैभव संपन्न जंगल परिसर, पर्यटकांना मोहीत करणारे निसर्गरम्य स्थळे ,प्रसन्न वातावरण , शासकीय हत्ती कॅम्प, उंच डोंगरावर असलेल्या तलाव, त्या परिसरातील धबधबे, मुबलक पाणी आणि खाद्यसामग्रीचा ठेवा, महाराष्ट्रातील एकमेव जंगली म्हशीसाठी राखीव असलेले प्रसिद्ध कोलामार्का अभयारण्य, गिधाड संरक्षण केंद्रे, वडधम जीवाश्म पार्क,लक्का मेट्टा हे नैसर्गीक लक्षागृह,राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी श्रमदानातून आदिवासी मुलांसाठी बांधलेली महाराष्ट्रातील पहिले आश्रम शाळा, व इतर स्थळे पर्यटकांसाठी विशेष आकर्षित केंद्र आहेत. 
   कमलापूर हे महाराष्ट्रातील एकमेव राखीव हत्ती संवर्धन क्षेत्र आहे.वनविभागाच्या हत्ती कॅम्प परिसरात तीन डोंगर होते. या डोंगराच्या पायथ्याशी मोठा तलाव आहे. रखरखत्या उन्हात हिरवेगार निसर्गसौंदर्य केवळ नजरेलाच नव्हे तर मनालाही गारवा देऊन जाते. हिवाळ्याच्या दिवसात तर येथील सौंदर्य अधिक खुलते धुक्यात हरविलेले डोंगरमाथे जणू तलावाच्या पाण्यावर जमलेली धुक्याची चादर काश्मीरची आठवण करून देते. हे स्थळ राज्याच्या नकाशावर वनवैभव्याची भर टाकणारी आहेत. राज्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील कोलामार्का संकुलात रानटी म्हशींचे अस्तित्व आहे. सिरोंचा वनविभागाकडून या म्हशींच्या संवर्धनाचे काम अविरतपणे सुरू आहे. त्याचप्रमाणे  तालुक्यातील घनदाट जंगलात वडधम येथे डायनोसोरचे जीवाश्म आढळून आले आहे.आता त्याठिकाणी वडधम जीवाश्म पार्क म्हणून संरक्षित करण्यात आलेले आहे.
प्राणहिता नदीच्या काठावरील घनदाट जंगलात प्राचीन काळापासून लक्का मेट्टा हे नैसर्गीक लक्षागृह प्रसिद्ध आहे. प्राचीन कथांनुसार महाभारत काळात जेव्हा कौरवांनी पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा पांडवांनी लक्षागृहात आश्रय घेतला होता. हे लक्षागृह बराच काळ जळत राहिले आणि पांडवांची त्यातून आपली सुटका करून घेतली होती. त्यासाठी पांडवांनी एक छुपा मार्ग वापरला, जो तलावात उघडत होता. लक्षागृहाच्या विटा, छुपा मार्ग, तलाव या सर्व सत्याची साक्ष हे स्थळ अजुनही देत आहे. लक्षागृह हे नैसर्गिक घटकांचे बनलेले आहे. चमत्काराचा नैसर्गिक वारसा लाभलेल्या या प्रदेशाला अभ्यासकांनी अवश्य भेट द्यावी.प्रत्यक्ष या भागाचे अवलोकन केल्यानंतर येथे जणू स्वर्गच उतरल्याचा भास होतो.

अरूण झगडकर,गोंडपिपरी
९४०५२६६९१५

Tuesday, 12 July 2022

निसर्गाची मुक्तहस्त उधळण:- झाडीपट्टी

निसर्गाची मुक्तहस्त उधळण:-  झाडीपट्टी

नैसर्गिक वनसंपदाने समृद्ध असलेल्या महाराष्ट्राच्या पूर्व भागातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया,चंद्रपूर हे चार जिल्हे म्हणजेच आमची झाडीपट्टी होय. या चार जिल्ह्यातील मुख्य नदी म्हणजे वैनगंगा.या नदीच्या पवित्र पाण्याने आणि काठावरील विविध तीर्थक्षेत्रांच्या पावन स्पर्शाने सुपीक झालेली माती, निसर्ग संपन्न वनस्पती, वन्यजीव, ऐतिहासिक स्थळे, गावतलाव आणि हिरवेगार भाताची पिके पर्यटकांना आकर्षित करतात.
    सम्राट अशोकांचे वास्तव्य असल्याची साक्ष देणारे अनेक प्राचीन वास्तू जमिनीच्या भूगर्भात गडप झाले असल्याचे दिसून येते जसे मुलचेरा येथील बौद्ध स्तूप, सातवाहन काळातील विविध प्रकारची प्राचीन अवशेष, वाकाटकालीन वास्तू, परमार काळातील जीर्ण झालेली मंदिरे, झाडीपट्टीच्या प्राचीन वैभवाच्या खुणा दर्शवितात. प्राचीन काळी गोंडवाना प्रदेश म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या या प्रदेशाला आता झाडीपट्टी म्हणून ओळखले जाते.
     झाडीपट्टी हा भाग प्रामुख्याने भारताच्या मध्यभाग होय. पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यासह मध्यप्रदेश ,छत्तीसगड आणि तेलंगणा या तिन्ही राज्याच्या सीमा भागात झाडीपट्टीची संस्कृती प्रामुख्याने आढळून येते. या भागातील भाषा सण उत्सव उत्सव रूढी परंपरा जवळपास दोन-दोन संस्कृतीची मिळत्यात जुळत्या आहेत. या भागात बौद्ध संस्कृतीच्या पाऊलखुणा सोबतच इतर धर्मियांच्या सण,उत्सवाचा प्रभाव येथील लोकजीवन झाल्याचा दिसून येतो. त्यामुळे झाडीपट्टी वैभव्यांनी समृद्ध आहे.
    अतिशय विलोभनीय आणि मनाला भरणारे निसर्गसौंदर्य मध्य भारतातील नंदनवन असल्याची ग्वाही देतात. घनदाट वनश्रीचा गालिचा पांघरलेला झाडीपट्टीचा प्रदेश विविध रोगावरील रामबाण वनौषधींची खजिना आहे. वैनगंगेसह वर्धा, प्राणहिता, इंद्रायणी, गाढवी, खोब्रागडी, पोटफोळी व अन्य नद्यांच्या सततच्या खळखळनाऱ्या प्रवाहांनी निसर्गात नादमृदुंगाचे सूर उमटतात. गावागावातील जलाशयाची शितल शांतता व सुबकता झाडीपट्टीचा समृद्धीची साक्ष देतात. 
   एटापल्ली तालुक्यात सुरजागड डोंगर आहे. सूरजागडच्या डोंगररांगा २७ किलोमीटर पसरलेल्या आहेत. तो सूरजागड पहाडी म्हणून ओळखला जातो. या जंगलामध्ये वनस्पती आणि प्राणी यांच्या विविध प्रजाती आहेत. या प्रदेशातील घनदाट जंगल आणि हिरवळ या भागातील पर्यकटकांना आकर्षित करते. झाडीपट्टीच्यापरिसरातील दगडांमध्ये भरपूर लोहखनिज आहे. हे नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या डोंगराळ भागातील फुलपाखरांच्या प्रजातीही अभ्यासक आणि पर्यटकांना आकर्षित करतात. पावसाळ्यात, छोटे धबधबे आणि पूर आलेल्या नद्या या प्रदेशात विलक्षण दृश्य निर्माण करतात. पावसाळ्याच्या दिवसात झाडीपट्टीतील निसर्ग बहरून सृष्टीला नवा साज चढवतो.
     असा हा झाडीपट्टीचा भाग म्हणजे निसर्गाची मुक्तहस्त उधळण होय. जणू झाडीपट्टी म्हणजे महाराष्ट्राचे काश्मीर असल्याचा भास होतो.

अरूण झगडकर,गोंडपिपरी जि.चंद्रपूर
9405266915